India Morning News
मुंबई : शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात एक महत्त्वाचं विधान केलं आहे. “जर मी निवडून आलो असतो, तर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले असते”, असं पाटील यांनी सांगितलं. “माझ्या मागील निवडणुकीत, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांमध्ये अडीच अडीच वर्षं मुख्यमंत्री पदावर असणं एक मोठं उदाहरण होतं”, असं ते यावेळी म्हणाले.
सांगोला येथील एका कार्यक्रमात शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले, मी १९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो, त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते. २०१९ मध्येही मी निवडून आलो, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षं मुख्यमंत्री म्हणून कार्य केले. त्यानंतर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही एकत्र आले आणि एकनाथ शिंदे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले.
तसेच, पाटील यांनी त्यांच्या शिवसेनेशी असलेल्या नात्याबद्दल देखील भाष्य केलं. “माझं घराणं शिवसेनेचं आहे, मात्र कसा काँग्रेसकडे गेलो ते मला माहिती नाही. मी नेहमी शिवसेनेचा भगवा घेऊन निवडणुकीत उतरलो आणि विजय मिळवला”, असं पाटील यांनी सांगितलं.
गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी शहाजीबापू पाटलांना २५,३८६ मतांनी पराभूत केलं. देशमुखांना १,१६,२५६ मतं मिळाली, तर पाटलांना ९०,५७० मतं मिळाली. २०१९ मध्ये, पाटलांनी शेकापच्या अनिकेत देशमुख यांचा अवघ्या ७६८ मतांनी पराभव केला होता, ज्यावेळी पाटलांना ९९,४६४ तर अनिकेत देशमुखांना ९८,६९६ मतं मिळाली होती.











Comments are closed