India Morning News
पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच, शिर्डीतील साईसमाधी मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. साई संस्थानला मिळालेल्या ईमेलमधून ही धमकी दिली गेली आहे.
या ईमेलमध्ये मंदिरावर पाइपबॉम्बने हल्ला करण्याचा इशारा असल्याचे समजते. यासंदर्भात पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी, त्यांनी तात्काळ मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ही धमकी खरी आहे की केवळ खोडसाळपणाचा भाग, याचा तपास सध्या सुरू आहे.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांसह एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर ही धमकी आल्याने चिंता अधिक वाढली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलण्याची मागणी देशभरातून होत आहे.
विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच शिर्डी येथे साईसमाधीचे दर्शन घेतले होते. पहलगाम हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी “पाकिस्तानला उत्तर मिळेल” असे विधान केले होते. त्याच दिवसाच्या रात्री ही धमकी मिळाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.
दरम्यान, 6 मे रोजी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. अशा वेळी राज्य प्रशासनाची सर्व यंत्रणा ग्रामीण भागात व्यस्त असताना शिर्डीच्या मंदिराला मिळालेली धमकी अधिकच गंभीर मानली जात आहे.






Comments are closed