India Morning News
तुमसर (१४ नोव्हेंबर): भंडारा जिल्ह्यातील धानपट्ट्यात यंदा उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डळमळीत झाली आहे. अतिवृष्टी, कीड प्रादुर्भाव आणि वाढलेला खर्च यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढले असतानाच, शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र अवेळी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आपले धान खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकण्याची वेळ आली आहे.
तुमसर तालुका हा धान उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. तरीही येथे खरेदी केंद्र उघडण्यात होत असलेल्या विलंबामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत. अनेक शेतकरी सध्या हलक्या धानाची भरडाई सुरू करत असून, व्यापारी मनमानी दर देत असल्याचा आरोप केला जात आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या मेहनतीचे मोल मातीमोल होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
जरी शासनाने नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा केली असली, तरी ती प्रत्यक्षात मिळेल का याबाबत शेतकरी साशंक आहेत. काहींनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली असली, तरी अनेक शेतकरी अजूनही प्रक्रियेपासून वंचित आहेत.
ग्रामस्थांनी शासनावर नियोजनाच्या अभावाची टीका केली आहे. धान खरेदी प्रक्रियेतील उभारणी, तांत्रिक पडताळणी आणि निधी वितरणात होणारा विलंब शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत असल्याचे ते म्हणतात. “बोनस”च्या नावाखाली होत असलेली मदत तुटपुंजी असून, ती देखील विलंबाने मिळते, असे त्यांचे म्हणणे आहे.
शेतकरी वर्गाने शासनाला मागणी केली आहे की, दिवाळीपूर्वी आणि धान भरडाईच्या काळातच आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे. दरवर्षी धाननिघणीची वेळ ठाऊक असूनही खरेदी केंद्र उशिरा सुरू केल्याने व्यापाऱ्यांचाच फायदा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाने तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.











