India Morning News
मुंबई : राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान रविवारी उत्साहात पार पडले. काही ठिकाणी किरकोळ गोंधळ, भांडणे, पोलिसांशी तणाव अशी परिस्थिती दिसली. दुपारनंतर अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि निवडणूक प्रक्रियेला वेग आला. एकूणच राज्यभरात मिश्र प्रतिसाद मिळत असताना, याच दिवशी ठाण्यात एक महत्त्वाची राजकीय हालचाल घडली.
शिंदे गडातच उद्धव ठाकरेंचा मोठा राजकीय आघात-
शिवसेना (शिंदे) आणि भाजप यांच्यातील मतभेद गेल्या काही आठवड्यांपासून चव्हाट्यावर आले असून दोन्ही पक्षांत तणाव शिगेला पोहोचला आहे. ठाणे जिल्ह्यात शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांना भाजपने गळाला लावले आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्या गटाने ठाण्यातच, तेही एकनाथ शिंदे यांच्या परंपरागत पूर्व कोपरी मतदार संघात मोठी एंट्री करत शिंदे यांना धक्का दिला आहे.
आबा मोरे आणि समर्थकांचा मोठा निर्णय – मातोश्रीवर शिवबंधन
दोन दशकांपेक्षा जास्त काळ शिवसेनेत विविध पदांवर काम केलेले, आणि उपविभाग प्रमुख पदावर असलेले आबा मोरे यांनी शिंदे गटावरील नाराजी व्यक्त करत गटत्याग केला. ‘ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान होत नाही’ या कारणावरून मोरे यांच्यासह जवळपास २०० ते ३०० कार्यकर्त्यांनी थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत ‘मशाल’ हातात घेतली.
मोरे हे ठाण्यातील माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पूर्व कोपरीतील राजकारणाचे समीकरण बदलू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिंदे गटातील स्थानिक नेते, माजी नगरसेवकांकडून होणारी उपेक्षा हेही त्यांच्या गटत्यागाचे आणखी एक मोठे कारण असल्याचे सांगितले जाते.
या घडामोडीनंतर ठाण्याच्या राजकारणात नव्याने खळबळ माजली असून, उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच केलेल्या या ‘राजकीय स्ट्राईक’मुळे आगामी स्थानिक निवडणुकांच्या समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.





