India Morning News
मुंबई : . हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला असून, काही भागांमध्ये गारपीटसुद्धा झाली आहे. दुसरीकडे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर पोहोचला आहे.
पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाची शक्यता-
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. लातूर व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सोमवारनंतर जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.
कोकणात आर्द्रता वाढली; मुंबईत पावसाळी वातावरण-
कोकण किनारपट्टीवरील रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर आणि मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते, तर दुपारी काही भागांत सरी कोसळल्या. यामुळे उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला.
जळगाव, नांदेड आणि पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस-
रविवारी दुपारी जळगाव आणि नांदेड जिल्ह्यात व पिंपरी चिंचवड परिसरात अर्धा ते एक तास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. काही भागांत गारपीटही झाली. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला.
विदर्भात उन्हाचा तडाखा कायम-
पावसाच्या सरी पडत असल्या तरी विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अजूनही तीव्र उष्णतेची लाट जाणवत आहे. बहुतांश ठिकाणी तापमान ४० अंशांच्या आसपास असून, सायंकाळनंतर उष्मा काहीसा कमी होतोय. तरीही आकाश निरभ्र होताच पुन्हा तापमान झपाट्याने वाढत आहे.राजस्थानच्या पश्चिम भागातून विदर्भाच्या दिशेने सरकणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभरात पावसासाठी अनुकूल हवामान निर्माण झाले आहे. वाढत्या तापमानामुळे वातावरणातील बाष्पीभवनात वाढ झाली असून, यामुळे अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे.










Comments are closed