India Morning News
नवी दिल्ली : मंगळवारी (दि. 9) होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल जवळपास ठरलेला असला तरी तिच्यातील राजकीय अर्थ फार मोठा मानला जातो. एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जातो.
एनडीएची खात्रीशीर ताकद
संसदेत एकूण 782 खासदार मतदान करणार आहेत. बहुमतासाठी 392 मतांची गरज आहे, तर भाजपकडेच लोकसभा-राज्यसभा मिळून 340 पेक्षा जास्त खासदार आहेत. मित्रपक्षांसह एनडीएचा आकडा 426 च्या आसपास पोहोचतो. म्हणजे राधाकृष्णन यांचा विजय निश्चिंत आहे.
विरोधकांचा डाव : संदेश महत्त्वाचा, विजय नव्हे
‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव नक्की असला तरी विरोधक ही लढत वेगळ्या हेतूने लढवत आहेत. गुप्त मतदान आणि व्हिप लागू नसल्यामुळे क्रॉस व्होटिंगची शक्यता त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे. थोडीफार अतिरिक्त मते मिळाली तरी “एनडीएमध्ये असंतोष आहे” असा संदेश देशभर गाजवण्याचा त्यांचा डाव आहे.
प्रादेशिक पक्षांचे समीकरण
वायएसआर काँग्रेस, तेलुगू देसम, बीआरएस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस गट अशा प्रादेशिक पक्षांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. यातील कुणीही क्रॉस व्होटिंग केल्यास विरोधक त्याचा मोठा प्रचार करतील.
खरी कसोटी कुणाची?
एनडीएला ही निवडणूक म्हणजे सत्तेची ताकद दाखवण्याची संधी आहे. विरोधकांसाठी मात्र खरी कसोटी आहे पराभव किती कमी करता येतो आणि त्यातून किती राजकीय भांडवल उभं करता येतं.
निकाल निश्चित आहे, पण संदेश ठरवणार आहे उद्याच्या राजकारणाचं दिशानिर्देश.








Comments are closed