India Morning News
मुंबई : अभिनेता संजय दत्त आणि सुनील शेट्टी हे ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये नुकतेच पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या वेळी दोघांनी एकमेकांशी असलेली मैत्री, करिअरमधले अनुभव आणि आजच्या चित्रपटसृष्टीबद्दल थेट मतं व्यक्त केली.
कपिल शर्माने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय दत्त म्हणाला, “आता काम करणाऱ्या कलाकारांमध्ये प्रचंड असुरक्षितता आहे. मी करिअरच्या शिखरावर असताना दिलीपकुमार, संजीव कुमार, शम्मी कपूर यांच्यासोबत काम केलं. आमच्यात कधीही ईर्ष्या किंवा असुरक्षितता नव्हती. उलट आम्ही एकमेकांकडून शिकायचो. चित्रपट चांगला व्हावा हीच आमची खरी इच्छा होती.”
सुनील शेट्टीनेही त्याला दुजोरा देत सांगितलं की, “सुरुवातीला मी अभिनयात खूपच कच्चा होतो. लोकांनी मला लाकडी अभिनेता म्हणून हिणवलं. पण संजय दत्त, जॅकी श्रॉफ, गोविंदा, सनी देओल यांच्याकडून शिकत राहिलो. त्या काळी असुरक्षिततेपेक्षा एकमेकांविषयी आदर होता. आज मात्र व्हर्च्युअल जगाने कलाकारांना अधिकच घाबरवून टाकलं आहे.”
संजय दत्तने तर नवोदितांना थेट आव्हानच दिलं. “आजचे कलाकार दुसऱ्याचा चित्रपट चालू नये अशी मनोमन इच्छा करतात. पण खरं तर सर्वांचे सिनेमे यशस्वी व्हायला हवेत. एक हिट मिळालं की नवीन कलाकारांचा स्वभाव बदलतो. पण इंडस्ट्रीत टिकायचं असेल तर एक-दोन हिट्स पुरेसे नाहीत. ४० वर्षे टिकून दाखवा, तेव्हा खरा कलाकार कोण ते कळेल,” असा जोरदार टोला त्याने लगावला. संजय दत्त आणि सुनील शेट्टीच्या या स्पष्टवक्तेपणामुळे सध्या बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या ‘स्टार्समधील स्पर्धा विरुद्ध एकोपा’ या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.








Comments are closed