India Morning News
पुणे: महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तब्बल 68 लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली, पण सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली आहे. महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या या निष्काळजी धोरणावर तीव्र टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
पंजाब सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रु. मदत दिली, तर महाराष्ट्रात मात्र सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली. कोरडवाहू पिकांसाठी 18,500 रु. (आधी 8,500), हंगामी बागायतीसाठी 27,000 रु. आणि बागायतीसाठी 32,500 रु. अशी किरकोळ वाढ केली गेली. ही रक्कम सोयाबीनसारख्या पिकांच्या बियाणे आणि पेरणी खर्चालाही पुरत नाही, तर फळबागांचे लाखोंचे नुकसान कसे भरून निघेल?
रोहित पवार यांनी ठणकावले की, शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या फळबागा एका रात्रीत उद्ध्वस्त झाल्या, जणू मूल गमावल्याचे दुख: सहन करावे लागले. अशा परिस्थितीत हेक्टरी किमान 50,000 रु. मदत आवश्यक आहे. देशाची तिजोरी भरवणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रती सरकारचा हा निष्ठूरपणा दुर्दैवी आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आखडता हात घेऊ नये, असे आवाहन पवार यांनी केले. अद्याप वेळ गेलेली नाही, सरकारने शेतकऱ्यांची काळजी घेत सरसकट 50,000 रु. मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचे हाल पाहता सरकार काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed