India Morning News
अमरावती : राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि सरकारच्या दुर्लक्षावर बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे. गुलाबराव पाटलांच्या गावाला भेट देत त्यांनी म्हटले की, “गुलाबराव पाटलांचे प्रेम कमळावर वाढले आहे. इतका चांगला गुलाब असताना तुम्ही कमळाच्या मागे का लागले?”
बच्चू कडू म्हणाले की, 5 ऑक्टोबरला ते जळगावमध्ये राहणार आहेत आणि गुलाबराव पाटलांनी बोलवल्यास घरात देखील भेट देण्यास तयार आहेत. त्यांनी म्हटले, “गुलाबरावांनी शेतकरी पुत्र म्हणून राहायला पाहिजे. सध्या ते मंत्री असले तरी सभागृहात त्यांचा आवाज शेतकऱ्यांसाठी ऐकू येत होता, पण सध्या तो दबलेला दिसतो आहे. शेतकऱ्यांचा आवाज दबू नये, म्हणूनच आम्ही बोललो.”
बच्चू कडूंच्या मते, सरकारने डॉक्टर, शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग शिक्षक यांकडे लक्ष दिले नाही, तर लक्ष फक्त गुटखा, रेती यांच्याकडे आहे. त्यांनी सरकारवर आरोप केला की पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर दिसत नाहीत आणि प्रशासन नुकसानीचा अर्धा सर्वे करत असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, “राज्यात दररोज 13 ते 15 लोक आत्महत्या करत आहेत. नागरिकांमध्ये हाहाकार आहे, पण सरकार खुश आहे. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाहीत. बावनकुळे यांना गणपती, दहीहंडी साठी वेळ मिळतो, पण शेतकऱ्यांसाठी नाही.”
बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत म्हटले, “निवडणुकीच्या आधी शेतकरी फक्त हिंदू असतो, सत्ता आल्यानंतर शेतकरी हिंदू नसतो.”
या वेळी त्यांनी सरकारला आव्हान दिले की, शेतकरी पुत्र म्हणून ते नेते आणि सत्ताधारी यांच्यासमोर आपले मुद्दे मांडायला तयार आहेत.
Comments are closed